गणेशपूजन आणि आरोग्यरक्षण


मन खंबीर करण्याची, संतोषी वृत्ती ठेवण्याची आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी एखादं निमित्तमात्र कारणही निर्माण करून त्यातून सामाजिक आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी, बंधुभाव निर्माण करणारा गणेशोत्सव खूप महत्त्वाचा वाटतो. 

गणेशोत्सवामध्ये वातावरणातला भरपूर उत्साह आणि आनंद भरलेला असतो. मुलांच्या स्पर्धा, नवीन सजावट, मखर, नवनव्या कल्पना, त्या पाहण्यासाठी होणारी गर्दी असं चित्र दिसू लागतं. या उत्सवी स्वरूपात आरोग्य संदेशही दडलेला असतो हे समजल्यावर आपण चकीत होतो आणि आपल्याला अभिमानही वाटू लागतो. गणेशोत्सवामागचा आरोग्यविचार समजून घेताना टिळकांनी १०० वर्षांपूर्वी समाजबांधणीसाठी गणेशोत्सव सुरू केला होता, हेही लक्षात ठेवावं लागेल. 

पार्थिव गणेशपूजन म्हणजे मातीची छोटी गणेशमूर्ती बनवून गणेशोत्सवादरम्यान त्याची घरोघरी वा सार्वजनिक ठिकाणी स्थापना करणं. हे प्रतीक पूजनही सांगितलं आहे. या प्रतीकामध्ये श्रद्धा ठेऊन त्यात जिवंतपणा आहे असं समजण्यासाठी त्याची विधीवत पूजा करून त्यात प्राणप्रतिष्ठा केली जाते. या मानवी भावना आणि श्रद्धा जिवंत असणं आज खूप गरजेचं आहे. जिथे माणसा-माणसामधला विश्वास कमी होत आहे तिथे असा श्रद्धा आणि भक्तीचा प्रयत्न निश्चितच आवश्यक आहे. 

गणेशोत्सव चालू असेपर्यंत त्या मूर्तीत जीव आहे असं समजून त्याच्या आनंदासाठी त्याला पाहुणा नव्हे तर घरातला सदस्य समजून त्याच्या आवडीच्या गोष्टी, प्रसाद, नैवेद्य, गाणी-गप्पा करतो. आपली दुःखं विसरून घरातल्या सर्व सदस्यांना एकत्र बोलावतो. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दुःखं बाजूला ठेवण्यासाठी आग्रह धरणारा दुसरा कोणताच सण पाहण्यात नाही. हाच नियम आपल्या जीवलगांसाठीही लागू होतो. असताना आनंद आणि नसल्याचंही दुःख नाही पण स्मृती मात्र ठेवण्याचा मोठा संदेश मानसोपचारतज्ज्ञांपेक्षाही खूप मोठा उपचार ठरतो. 

मन खंबीर करण्याची, संतोषी वृत्ती ठेवण्याची आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी एखादं निमित्तमात्र कारणही निर्माण करून त्यातून सामाजिक आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी, बंधुभाव निर्माण करणारा हा उत्सव म्हणूनच खूप महत्त्वाचा वाटतो. जगभर नावाजलेला, आद्यपूजेचा मान असणारा हा गजानन स्वतःही आरोग्यक्षेत्रातल्या अत्युच्च प्रगतीचं एक प्रतीक आहेच. विविध अवयव प्रत्यारोपणासाठी एवढे प्रयत्न सुरू असताना मानवी शरीरावर प्राण्याच्या शिराचं प्रत्यारोपण हे एक मोठं उदाहरण आहे. बुद्धीमत्ता, चाणाक्षपणा, ताकद, शौर्याचं प्रतीक म्हणजे गणपती. त्याचे भक्तही त्याला देवापेक्षा मित्रच जास्त मानतात. 

आरोग्याचा आणि गणेशाचा संबंध हा चहूबाजूंनी येतो. आध्यात्मिक, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक अशा सर्वच स्तरांवर आरोग्यरक्षण गजाननाच्या केवळ नामोच्चारातच येतं. रोगनाशनासाठी जेव्हा या चारही स्तरांवर प्रयत्न होतो तेव्हाच रोग समूळ नष्ट होतो असं म्हणतात. सामाजिक स्तरावर एकोपा, बंधुभावाने मनाला चैतन्य देऊन निराशा आणि उदासिनता नष्ट करतो. आध्यात्मिक स्तरावर श्रद्धा आणि भाव लीन झाल्याने आपल्या पाठिशी कोणी असल्याच्या भावनेने उभारी येते आणि आत्मिक बळ वाढतं. मानसिक स्तरावर दुःख गिळणं आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं, प्रिय गोष्ट गमावल्यानंतर दुःख सोडून आहे त्यात समाधानी राहण्याची प्रेरणा मनाला देणं अशी उन्नती घडवतो. 

आपल्या प्रसाद, पूजेच्या वस्तूंमधून आपल्या शारीरिक विकारांवर कशी मात करायची याचं मार्गदर्शन गणपती करतो. उदा. पित्तावर दुर्वा, परिपूर्ण क्षुधाशांतीसाठी केळी आणि मोदक, वातविकारांवर नारळ, रक्तदाबावर जास्वंद आदी. विविध पातळ्यांवरून आरोग्यरक्षणाचा मंत्र देणारा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने वेगळा आहे.

Source : Maharashtra Times (Link)

No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us